१५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे’ या कविता प्रत्येकाने जरूर चिंतन करण्यासारख्या आहेत...
.......
ते माझे घर....ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।
आजी आजोबा वडील आई
लेकरांसवे कुशीत घेई
आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।
कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।
भिंती खिडक्या दारे नच घर
छप्पर सुंदर तेही नच घर
माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।
परस्परांना जाणत जाणत
मी माझे हे विसरत, विसरत
समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।
मन मुरडावे, जुळते घ्यावे
सुख दुःखाना वाटुन घ्यावे
भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।
ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।
बलसंपादन गुणसंवर्धन
धार्मिकतेची सोपी शिकवण
अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।
...........
घर असावे घरासारखेघर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी
अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी
या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती
- विमल लिमये